पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण २०९ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चौथ्या टप्प्यांत वाडा तालुक्यातील केलटान, सापाने व कारळगाव येथे ७७ शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन १५ जून २०१९ रोजी झाले. स्वच्छतेसाठी बकेट, मग आणि सफाईचे साहित्यही देण्यात आले.
या वेळी गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, सरपंच सौ. म्हात्रे यांच्यासह स्थानिक अधिकारी, पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मुकुल माधव’कडून बबलू मोकळे व मंगेश तळेकर उपस्थित होते. राजलक्ष्मी येरपुडे यांनी ‘मुकुल माधव’च्या कामाचे कौतुक केले. आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागृती आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. सोनाळे गावातील शौचालयांची देखभाल आणि त्याचा होत असलेला वापर समाधानकारक असल्याचे सांगून, गावकऱ्यांनी उघड्यावर शौचास न जाता या शौचालयांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खेरवाडी सोशल वेल्फेअर असोशिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अत्याधुनिक शौचालये बांधली आहेत. याआधी वाडा तालुक्यातील सोनाळे येथे ५० शौचालये, सौरदिवे बसविण्यात आले. झेडएफ स्टिअरिंग गिअर या कंपनीच्या मदतीने वडवली गावात सौरदिव्यांसहित ३० शौचालये, तर तिसऱ्या टप्प्यात बावेघर, हमरापूर व केव गावात ५० शौचालयांचे व सोलर पंप बसविण्यात आले. चौथ्या टप्प्यात आणखी ७७ शौचालये उभारण्यात आली असून, एकूण २०७ शौचालये व सोलर पंप उभारण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभले आहे. या वेळी सोलापूर येथील माढा वेल्फेअर फाउंडेशनने या उपक्रमात सहभाग घेत २०० सोलापुरी चादरींचे वाटप केले.
या विषयी बोलताना ‘मुकुल माधव’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, ‘फिनोलेक्स आणि ‘मुकुल माधव’ने २०० शौचालयांचा टप्पा ओलांडला आहे. आदिवासी भागातील जास्तीत जास्त लोकांना या प्रकल्पाचा लाभ देण्यासाठी समविचारी लोकांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहोत. हिंदुजा लिलॅंड फायनान्सच्या मदतीने दोन हजार १७३ जणांना शुद्ध पाण्याची सुविधा दिली आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शौचालये आणि सौर दिव्यांसह या भागात पाणी संवर्धनासाठी उपक्रम सुरु आहेत.’